‛लॉकडाऊन’मुळे सायकलवर कुटुंबाला घेऊन घरी निघाला, अपघातामध्ये दोघांचाही जीव गेला



लखनऊ : सहकारनामा ऑनलाईन

देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर परराज्यात काम करणारे मजूर काम नसल्याने मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी जात आहेत.कुणी पायी निघाले आहे, तर कुणी सायकलवर प्रवास करत आहे.  कालच औरंगाबाद जवळ अश्याच पायी निघालेल्या 16 मजुरांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला होता. तशाच पध्दतीची हृदय पिळवटून टाकणारी घटना लखनऊ जवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार लखनऊच्या सिकंदरा गावात राहणारा कृष्णा साहू (वय 45) आणि त्याची पत्नी प्रमिला (वय 38) हे जोडपे आपल्या दोन मुलांना घेऊन सायकलवरुन छत्तीसगडचा बीमीत्रा येथे जाण्यासाठी निघाले होते. हा प्रवास 750 किमीचा होता तो ते सायकलवरुनच करणार होते. हे कुटुंब साधारण सायकल चालवत 25 किमी अंतरापर्यंत आल्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास एका वाहनाची त्यांच्या सायकलला धडक बसून कृष्णाची पत्नी प्रमिला जागीच ठार झाली तर कृष्णाला रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघात भीषण असूनही केवळ नशीब बलवत्तर म्हणून यात त्यांची दोन्ही मुले वाचली. मात्र केवळ पैसे नसल्याने आपल्या कुटुंबाला सायकलवर घेऊन जाणाऱ्या कृष्णासोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वांचीच मने हेलावून टाकली. कृष्णाची दोन्ही मुले सध्या त्यांच्या काकाकडे आहेत.