Bharat Band : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे निषेध आंदोलन



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी आज  दि. 8 डिसेंबर रोजी भारत बंद आंदोलन पुकारले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भारत बंद आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी दौंड शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे व तालुका अध्यक्ष आप्पासो पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शिवाजी चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. 

देशात मोठ्या प्रामाणावर होत असलेल्या कृषी आंदोलनाला शहरातील व्यापाऱ्यांनीही साथ द्यावी आणि स्वखुशीने आपली दुकाने बंद ठेवावीत असे आवाहन यावेळी करण्यात आले. या आंदोलनावेळी मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच शेतकऱ्यांवरील अन्यायकारक असलेले कृषी कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनाला नगरसेविका प्रणोती चलवादी, आप्पासो पवार, तसेच वैशाली नागवडे यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांविषयी जाण नसलेल्या मोदी सरकारवर कडाडून टीका केली आणि सरकारला शेतकऱ्यांच्या भावनेचे काही देणे घेणे नसल्याचे त्यांच्या कृतीतून दिसत असल्याने त्यांचा निषेध केला.