धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

दौंड : धनगर समाजाच्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याच्या मागणीसाठी दौंड तालुक्यातील धनगर बांधवांकडून दौंड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी धनगर आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी, श्री संत बाळूमामा देवस्थानसाठी स्वतंत्र कायदा, मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवरील कनेक्टिंग लिंकला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नाव देणे तसेच चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणे, या प्रमुख मागण्या शासनाकडे करण्यात आल्या.

धनगर समाजाच्या न्याय्य हक्कांसाठीचा हा संघर्ष केवळ मागण्यांचा नसून स्वाभिमान, अस्मिता आणि न्यायाचा लढा आहे. शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

निवेदन देतेवेळी पाटस गावचे माजी सरपंच संभाजी खडके, संचालक आबासाहेब चोरमले, संदिपान वाघमोडे, मोहन पडवळकर, मनोज टेळे, ओंकार कड्डे, लव्हाजी पिसे, वैभव आटोळे, सौरभ टेंगले, सागर सलगर तसेच धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.