निचतेचा कळस | संस्कृती जपा म्हणता मग आमदारांच्या पत्नी आणि मुलीवर नको त्या कमेंट करताना संस्कृतीचा विसर का..?

दौंड : शेजारील तालुक्यात एक गंभीर घटना घडली आणि येथील राजकीय खुन्नस कधी काढायला मिळते याची वाट पाहत बसलेल्या राजकीय ढोंगी संधीसाधूंनी अखेर आपल्यावर झालेले संस्कार हे चुकीचेच होते याची प्रचितीच दिली. प्रेमाच्या आहारी गेलेल्या प्रेमी युगलाने ऐनवेळी नको तो निर्णय घेतल्यानंतर जो भडका उडाला त्यात आपल्या राजकीय दुश्मनाला यात कसे टार्गेट करता येईल याचा पुरेपूर फायदा उचलण्यात आला.

संधीची वाट पाहणाऱ्या महाभागांनी घडलेल्या घटनेत तालुक्याच्या आमदारांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. मात्र या संपूर्ण प्रकरणात टोळक्याचा राग नेमका कुणावर होता आणि कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी थेट आमदारांच्या पत्नी आणि वयाने अतिशय लहान असलेल्या त्यांच्या चिमुकलीलाही या प्रकरणात ओढत टार्गेट केले हा खरतर संशोधणाचा विषय आहे. या टोळक्याने टाकलेल्या पोस्ट आणि कमेंट त्या वाचणाऱ्याला सुद्धा शरमेने मान खाली घालायला लावेल अश्या भयानक पद्धतीने लिहिल्या गेल्या होत्या. या स्क्रिप्टेड पोस्ट आणि कमेंट ने संपूर्ण सोशल मिडिया व्यापून टाकला होता आणि त्या येथे दाखवू शकत नाही इतक्या भयानक होत्या.

स्वतःला माय, माऊलींचे रक्षक म्हणून घेणारे यावेळी एका चिमुकली आणि तिच्या आईवर अतिशय खालच्या दर्जाच्या नीच कमेंट आणि पोस्ट टाकून आपल्यावर झालेल्या संस्कारांचे दर्शन देत होते. यात सर्व प्रकरणात सर्वात मोठी भीती ही दोन जातीमध्ये (हिंदू मुस्लिम नव्हे) मोठा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र आमदारांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठा सय्यम दाखवत आपल्या सर्व सहकाऱ्यांना शांततेचा संदेश देत काहीही अघटित होऊ दिले नाही. शेवटी भांडण, दंगली करणं सोपं असतं मात्र त्यानंतर ते निस्तरणं खूपच कठीण असतं हेही आता अनेकांना कळून चुकलं आहे.

या घटनेच्या आडून एक टास्क मिळाल्याप्रमाणे कमेंट आणि पोस्ट करणाऱ्यांना आमदार हे सुद्धा त्याच धर्माचे आहेत याचे भान सुद्धा या स्वयंघोषित रक्षकांना राहू नये ही मोठी शोकांतिका आहे. संस्कृती जपा म्हणून नारा देणारे तर या सर्व खटाटोप मध्ये सर्वात जास्त आघाडीवर असल्याचे दिसत होते. काहीही करुन तालुक्याच्या निर्विवादपणे विश्वास जिंकणाऱ्या या कुटुंबाला बदनाम करूनच सोडायचे असा जणू चंगच या महाभागांनी बांधला होता. नको त्या कमेंट आणि नको त्या पोस्ट पाहून जर एखाद्याने त्यांना सबुरीचा सल्ला दिला तर ही ठराविक टोळी त्याला तेथेच शिव्या देऊन आपल्यावर झालेल्या संस्कृतीचा दाखला देत होती.

आपला पती तालुका आणि जिल्ह्याच्या विकासकामांना लागणाऱ्या निधीच्या मागणीसाठी अधिवेशनाला गेला असताना त्या कुटुंबातील त्या माय, माऊलींना अश्या भयानक प्रकारच्या पोस्ट, कमेंटला सामोरे जाताना त्यांची काय अवस्था झाली असेल आणि याचा त्यांच्या मनावर किती खोलपर्यंत आघात झाला असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही. स्वतःला धुतल्या तांदळासारखे दाखवून आमदारावर बेछुट आरोप करत लोकांना चिथावनी देणाऱ्या अनेकांचा मागील इतिहास पाहिला तर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही आणि आता याच लोकांनी युवकांना आणि सर्वसामान्य जनतेला संस्कृतीचे उपदेश देणे हे कितपत योग्य आहे याचाही विचार होणे आता गरजेचे बनले आहे.

एखादी अप्रिय घटना घडली तर त्यावेळी विचार करण्याच्या मनस्थितिमध्ये अनेकजण नसतात आणि नेमकी हिच संधी साधून त्यांच्या मानसिकतेचा हवा तसा फायदा उचलत सर्व कट, कारस्थान शिजवले जाते आणि थेट आपल्या मुख्य टार्गेट असणाऱ्यावर सोडले जाते. या घटनेत सुद्धा हेच प्रकर्षाने पहायला मिळाले. ज्यांच्यावर महिलांबाबत अतिशय गंभीर गुन्हे दाखल झाले होते त्यांनीच यात आघाडी घेऊन पत्नी, मुलीला टार्गेट करणे हे कितपत योग्य होते असा सवालही आता उपस्थित होऊ लागला आहे.