खडकवासला – फुरसुंगी बोगद्याचे काम वेगाने सुरू, १ किमी बोगदा तयार.. आ.राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

पुणे : दौंड चे आमदार राहुल कुल यांनी वेळोवेळी मागणी करुन पाठपुरावा केलेल्या खडकवासला – फुरसुंगी बोगद्याचे काम आता युद्धपातळीवर सुरु झाले आहे. खडकवासला धरणाच्या कालव्यातील पाण्याची गळती, चोरी, जलप्रदूषण व बाष्पीभवन रोखण्यासाठी खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान ३४ किलोमीटर लांबीपैकी २८ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येत आहे. खडकवासला धरणाचे पाणी बोगद्याच्या माध्यमातून आणून ते विविध तालुक्यांना पुरवले तर मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होणार आहे अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी वेळोवेळी विधानसभेत केली होती.

आमदार कुल यांच्या या मागणीला यश येउन या कामाचे टेंडर निघाले आणि खडकवासला, धायरी, वडाचीवाडी आणि उरुळी देवाची अशा चार ठिकाणी एकाच वेळी टनेल (बोगदा) खोदण्याचे काम सुरू झाले आहे. मिळत असलेल्या अधिक माहितीनुसार साधारण दोन महिन्यांमध्ये विशेष यंत्रांच्या सहाय्याने सुमारे एक किलोमीटर बोगद्याचे काम आता पूर्ण झाले आहे. हे अतिशय वेगाने सुरु असून एका दिवसामध्ये आठ मीटर पर्यंत या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात येत आहे. या कामात अजूनही काही ठिकाणे निवडण्यात आली असून आणखी तीन ठिकाणांहून लवकरच कामास सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे.

खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान ३४ किलोमीटर लांबीपैकी २८ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे २२०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. जलसंपदा विभागाने १६०० कोटी रुपयांच्या कामांसाठीची निविदा काढली होती. त्यानुसार या बोगद्याचे काम आता टेंडर घेतलेल्या एका कंपनीकडून सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे सुमारे २.५ टीएमसी पाण्याची बचत होऊन यामुळे अधिकच्या ३ हजार ४७२ हेक्टरवरील शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

हे काम सुरु करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध खात्यांची मंजुरी अनिवार्य होती त्या प्रमाणे राज्य आणि केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याकडून या प्रकल्पाला मान्यता मिळताच या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी या कामास सुरुवात झाली आणि आतापर्यंत एक किलोमीटर लांबीच्या डी D आकाराच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण करण्याची मुदत तीन वर्षांची असणार आहे हे विशेष.