रात्र झाली तरीही बचाव कार्य सुरूच, शासनातर्फे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असणाऱ्या कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असणारा पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत वाहून गेलेल्या आणि पुलाखाली अडकलेल्या लोकांचा अजूनही शोध सुरु. रात्र झाली तरीही राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे २ पथक, आपदा मित्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि PMRDA चे अग्निशमन दल व स्थानिक मदत बचाव संस्थांचे घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनातर्फे प्रत्येकी ५ लाखांची मदत आपत्ती व्यवस्थापण मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली आहे.

इंद्रायणी नदीच्या पुलावर झालेल्या या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत २ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून तीन जण अजूनही पुलाच्या कोसळलेल्या भागाखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर पूल कोसळून पाण्यात वाहून गेलेल्या लोकांचा नेमका आकडा अजूनही समोर येताना दिसत नाही.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावा

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेल्या ठिकाणी राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सायंकाळी भेट देऊन परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा आढावा घेतला आहे.

महाजन यांनी इंदोरी गावाजवळील कुंडमळा इंद्रायणी नदीवरील पुल कोसळलेल्या स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना महाजन यांनी, इंद्रायणी नदीवरील पुलाच्या दुर्घटनेत मृत्युमुखी झालेल्या कुटुंबीयांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमी व्यक्तींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासनातर्फे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.