दौंड मध्ये गोमांस विक्रीसाठी गो-हत्या करताना तिघांना अटक, 250 किलो गोमांस जप्त

अख्तर काझी

दौंड : शहरातील खाटीक येथे गोमांससाठी गो हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. दौंड पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारून आरोपिंना जागीच पकडून त्यांच्याकडून 40 हजारांचे अडीचशे किलो गोमांस  जप्त केले आहे. याप्रकरणी अलीम मुस्ताक शेख, नितीन उचाप्पा गायकवाड व आसिफ कासम कुरेशी (तिघेही राहणार खाटीक गल्ली, दौंड) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 325,3(5), प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 5 (क),9(अ),9(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल करमचंद बाळासो बंडगर यांनी फिर्याद दिली आहे.

दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना 4 जून रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास खाटीक गल्ली परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये घडली. याबाबत पोलिसांना खबर मिळाली होती त्यानुसार त्यांनी खाटीक गल्ली परिसरात गायीची हत्या करण्यात येत असलेल्या ठिकाणी छापा मारला त्यावेळी अलीम शेख व नितीन गायकवाड हे गायीची कत्तल करताना जागीच सापडले. आसिफ कुरेशी याच्या सांगण्यावरून आम्ही गायीची कत्तल केली असे त्यांनी कबूल केले. या ठिकाणाहून पोलिसांनी 250 किलो गोमांस जप्त केले आहे.

दौंड चे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक घेऊन शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले होते, परंतु काही समाज विघातक प्रवृत्तीच्या लोकांमुळे शहरातील जातीय सलोख्याला तडा जात आहे. अशा समाज विघातक प्रवृत्तीच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.