अखेर कोरोनाचा थेऊरमध्ये शिरकाव, एका युवकाचा अहवाल Positive



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी)

गेल्या तीन महिन्यात एकही रुग्ण नसलेल्या थेऊरमध्ये एका युवकास कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने गावात कोरोनाचा शिरकाव झाला, त्याच्या कुटुंबातील अकरा जणांची चाचणी करण्यात आली असून रिपोर्ट येणे बाकी आहेत.तो संपूर्ण परिसर निर्जंतूक करून सिल करण्यात आला आहे. 

कोरोना लाॅकडाऊन हळूहळू शिथिल केल्यानंतर गेल्या तीन महिन्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण नसलेल्या थेऊर गावात नागरिकांच्या स्थलांतरामुळे कोरोनाचा धोका वाढला, कामधंदा नसल्याने अनेक रोजंदारी करणारे मजूर कामाच्या शोधात फिरताना दिसत आहेत.या कामगारांचा कोणाशी संपर्क आला तर संबंधित गावात कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो.कारण असेच एक प्रकरण दोन दिवसापूर्वी थेऊर येथे कामासाठी आलेला स्थलांतरीत मजूर कामावर रुजु होण्यासाठी गेला तेंव्हा त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली त्यावेळी तो पाॅजिटीव आढळून आला त्यामुळे त्याच्या संपर्कातील त्याचा एक जोडीदार त्याला विलगीकरण केले आहे.त्यानंतर आज सोमवारी गावातील एका युवकास कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला.यावर ग्रामपंचायत कार्यालयात तातडीने बैठक घेण्यात आली त्यावेळी साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे, उपसरपंच नितीन कुंजीर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे, कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ मेहबूब लुकडे, आप्पासाहेब काळे, विलास कुंजीर, शहाजी जाधव, गोविंद तारु,पोलिस पाटील रेश्मा कांबळे, थेऊर उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी डाॅ पुजा सूर्यवंशी, आरोग्य सेविका भारती सोनवणे व आरोग्य सेवक प्रशांत बिराजदार आदी उपस्थित होते.यावेळी गावातील बाधीत क्षेत्र सिल करण्याचा निर्णय घेतला.

या संदर्भात कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ मेहबूब लुकडे यांनी सांगितले की,गावात प्रत्येक दुकानदारांनी सॅनिटायझर हॅन्ड ग्लोज व मास्क याचा वापर केलाच पाहिजे तसेच सलूनच्या संदर्भात कडक निर्बंध पाळणे आवश्यक आहे तसेच गावात प्रत्येकाला होमिओपॅथीक अर्सेनिक अल्बमच्या गोळ्याचे वाटप करावे असे सुचवले.त्याप्रमाणे विनाकारण गावात फिरणार्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. 

पूर्व हवेलीतील गावामध्ये कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढत आहेत यावर आवर घालण्यासाठी शासकीय यंत्रणा काम करत असल्या तरीही स्थानिक नागरीक, स्वयंसेवी संस्था यांनी याकडे गांभिर्याने घेण्याची आवश्यकता आहे.