अख्तर काझी
दौंड : बकरी ईद व छत्रपती संभाजी महाराज जयंती (7 जुन) एकाच दिवशी येत असल्याने शहरातील जातीय सलोखा आणि भाईचारा अबाधित ठेवण्यासाठी तसेच येथील कायदा सुव्यवस्था योग्य ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. दोन्ही उत्सवा दरम्यान कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता सर्वांनीच घेण्याची आवश्यकता आहे असे आवाहन पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी केले आहे.
दोन्ही उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन करताना गोपाळ पवार बोलत होते. मुस्लिम समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना व मार्गदर्शन करताना गोपाळ पवार म्हणाले की, बकरी ईद आनंदात व शांततेत साजरी करावी. व्हाट्सअप, फेसबुक या माध्यमांचे वापर करताना इतर धर्माच्या भावना दुखावल्या जातील असे संदेश किंवा पोस्ट टाकू नयेत. प्रत्येक समाजामध्ये समाज विघातक वृत्तींची काही लोक असतात, त्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे परंतु त्यांच्या प्रत्येक हालचालीवर व कृत्यांवर बारकाईने नजर ठेवावी.
समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे काही कृत्य त्यांनी केल्यास अशा व्यक्तींची वेळीच पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, तरच शहर शांत राखण्यासाठी मदत होईल. बकरी ईद निमित्त कुर्बानी देताना गोवंश हत्या होणार नाही याची काळजी व भान ठेवावे. कायद्याने संमती दिलेल्याच प्राण्यांची कुर्बानी द्यावी व कायद्याचे पालन करावे. आपल्या एखाद्या कृत्यामुळे संपूर्ण समाजालाच अपमानित व्हावे लागेल किंवा समाजावरच आक्षेप येईल असे कृत्य कोणीही करू नये. कायदा तोडणाऱ्या काही चुकीच्या कृत्यांमुळे पोलिसांना गुन्हे दाखल करावी लागतात, याचे दुष्परिणाम संपूर्ण समाजाला ,कुटुंबाला भोगावे लागतात.
गुन्हे दाखल झालेल्यांना नोकरी मिळणेच अवघड होऊन बसते. विशेषतः ज्या मुस्लिम बांधवांवर गुन्हा दाखल होतो त्याला पवित्र अशा हज यात्रेला जाण्यासाठी कायदेशीर अडचण येते व त्याला हज यात्रेला मुकावे लागते. आणि अशावेळी पोलीस प्रशासनही त्यांना मदत करू शकत नाही ही गोष्ट मुस्लिम बांधवांनी अत्यंत गांभीर्याने समजून घेतली पाहिजे. त्यामुळे आपल्या हातून कायद्याचा भंग होणार नाही असेच आपले आचरण ठेवावे.
भाईचारा- जातीय सलोखा नेहमीच अबाधित ठेवण्याची आपल्या शहराची परंपरा आहे ती कायम ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत दोन्ही उत्सव आनंदात साजरे करावेत असे आवाहन सुद्धा पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी केले आहे.