आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर कारवाई, 72 तासांत कंपनी बंद करण्याच्या सूचना.. रोहित पवार म्हणतात हे माझ्या वाढदिवसाचे गिफ्ट

पुणे : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती येथील मोठ्या कंपनीवर मोठी कारवाई करण्यात आली असून ही कंपनी 72 तासांत बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
बारामती अ‍ॅग्रो असे त्यांच्या या कंपनीचे नाव असून या कंपनीच्या बारामती येथील प्लांटवर ही कारवाई करण्यात आली आहे.

आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाने कारवाई केली असून याची नोटीस त्यांना रात्री 2 वाजता देण्यात आली आहे. सदर नोटिसमध्ये 72 तासांत कंपनीचा हा प्लांट बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत खुद्द आ.रोहित पवार यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

हे आपल्या वाढदिवसाचं गिफ्ट, जनता रिटर्न गिफ्ट देईल – आ.रोहित पवार

या कारवाईबाबत आ. रोहित पवार यांनी माहिती देताना, “दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे 2 वाजता एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली.
“आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त ‘गिफ्ट’ दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच ‘रिटर्न गिफ्ट’ देईल, ही खात्री आहे. पण सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील.

युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करताना, भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे. हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही,” अशा शब्दांत रोहित पवार यांनी आपल्या राजकीय विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.