अख्तर काझी
दौंड : राज्यातील काही आमदार तसेच भाजपा सरकारशी संबंधित पदाधिकारी वारंवारपणे मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत, जाहीर सभेत चितावणीखोर भाषणे करीत आहेत, मुस्लिम समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप मुस्लिम समाजाने करत या आमदारांच्या विरोधात समस्त दौंड मुस्लिम समाजाच्या वतीने शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला.
शुक्रवारच्या नमाज पठणानंतर दौंड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आली. पोलीस स्टेशन समोरील संविधान स्तंभ परिसरात मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी झालेल्या निषेध सभेमध्ये सोहेल खान, बादशाह शेख, मतीन शेख, तजमुल खान, रतन जाधव, अमित सोनवणे, भारत सरोदे, प्रकाश सोनवणे यांनी आपल्या भाषणातून समाज विघातक कृत्य करणाऱ्या व दलित-मुस्लिम-ख्रिश्चन समाजाविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदारांचा निषेध नोंदवित त्यांच्या जातीयवादी कृत्यावर सडकून टीका केली.
अल्पसंख्यांक समाजामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करून त्यांना संपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र येत या परिस्थितीचा सामना केला पाहिजे असे आवाहन वक्त्यांनी यावेळी केले. पोलीस प्रशासनाला यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी शाही आलमगीर मशिदीचे विश्वस्त युसुफ इनामदार, माजी नगरसेवक शहानवाज पठाण, वसीम शेख तसेच इसामुद्दीन मण्यार, अकबर सय्यद, चांद शेख तसेच बहुसंख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, आमदार नितेश राणे, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर, महेश लांडगे तसेच किरीट सोमय्या, रामगिरी महाराज हे काही वर्षापासून सतत मुस्लिम समाजाविषयी, धर्माविषयी व त्यांच्या आस्थेविषयी वादग्रस्त विधाने करीत आहेत. तसेच जाहीर सभेत समाजाविषयी चीतावणीखोर भाषणे करीत आहेत. मुस्लिम समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. अशी कृत्ये करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करून त्यांची पदे रद्द करण्यात यावीत व मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.