Mumbai : राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ‛ते’ माहीर होते, पण… राज ठाकरेंची अनोख्या शब्दांत अहमद पटेलांना श्रद्धांजली



मुंबई : सहकारनामा ऑनलाइन

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल ह्यांचं कोरोनाने निधन झालं. राज्यातील आणि देशातील सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पण राज ठाकरेंनी मात्र अगदी कमी शब्दांत पटेलांना वाहिलेली श्रद्धांजली सर्वांनाच भावून गेली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहताना, ते कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते, राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ते माहीर होते, 

पण ही असाधारण क्षमता त्यांनी राजकीय लढाया जिंकण्यापुरतीच वापरली, तिला कधी त्यांनी व्यक्तिगत हेवेदावे ह्यासाठी वापरलं नाही. त्यामुळेच ह्या खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. 

राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा एखाद्याशी स्नेह तयार झाला की त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुख दुःखांच्या प्रसंगात ते ठाम उभे राहत ह्याचा अनुभव मी देखील घेतला आहे.

४३ वर्ष सक्रिय राजकारणात राहून, आणि अहमद पटेल ह्यांचं निवासस्थान अनेक सत्तांतराचं केंद्रस्थान होऊन देखील स्वतः सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणं हा त्यांचा गुण दुर्मिळच म्हणावा लागेल.

अशा विशेष शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे राज ठाकरे यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.