राज्य शासनाने बारवकर कुटुंबियांना तातडीने मदत करावी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांवर विधानसभेत आवाज उठवणार : आमदार राहुल कुल

दौंड : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परिक्षेची मागील तीन चार वर्षांपासून तयारी करून देखील वारंवार परिक्षा लांबल्यामुळे व इतर अनेक अडचणीमुळे राज्यातील लाखो विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. शासकीय दुराव्यास्था व संबंधित यंत्रणेच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून दौंड तालुक्यात या अगोदर स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती व आता देऊळगाव गाडा येथील मल्हारी बारवकर या mpsc च्या विद्यार्थ्याने आत्मत्या केल्याने शासनाने बारवकर कुटुंबियांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केली असून विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या आत्महत्यांवर येत्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे यावेळी आमदार राहुल कुल यांनी सांगितले आहे.

नुकतीच देऊळगाव गाडा, ता. दौंड, जि. पुणे येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परिक्षेची तयारी करीत असलेल्या मल्हारी नामदेव बारवकर या २५ वर्षीय तरुणाने शिक्षणासाठी घेतलेले कर्ज व वारंवार परिक्षा लांबल्यामुळे आलेल्या नैराश्यातून दि. १७ डिसेंबर २०२१ रोजी आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून त्याने आत्महत्या का केली ही बाब समोर आली आहे. बारवकर कुटुंबाची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे मल्हारीच्या शिक्षणासाठी असलेली शेती विकल्यामुळे सदर कुटुंब भूमिहीन झाले आहे त्यातच त्यांचा एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परिक्षेची मागील तीन चार वर्षांपासून तयारी करून देखील वारंवार परिक्षा लांबल्यामुळे व इतर अनेक अडचणीमुळे राज्यातील लाखो विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. शासकीय दुराव्यास्था व संबंधित यंत्रणेच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून यापूर्वी दौंड तालुक्यातील केडगाव येथील कै. स्वप्नील लोणकर याने देखील आत्महत्या केली होती. शासकीय अनास्था व संबंधित यंत्रणेच्या अनागोंदी कारभाराचा बळी ठरवलेल्या कै. मल्हारी नामदेव बारवकर यांच्या कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित दादा पवार व विरोधी पक्षनेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे केली आहे.