मुंबई : पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या रिंगरोड आणि इलेव्हेटेड रस्त्यांच्या प्रकल्पांचे स्वागत करत, आमदार राहुल कुल यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रकल्पांना गती देण्याची आणि शहरातील अतिक्रमणे तातडीने हटवण्याची आग्रही मागणी केली.
आमदार कुल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ यांनी भूसंपादनासाठी ६०० कोटींच्या निधीची तरतूद केल्याची आणि अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार राहुल कुल यांनी पुणे महानगर क्षेत्रातील दळणवळण सुलभ करण्यासाठी सर्व रिंगरोड आणि उड्डाणपुलांना मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचे मनापासून आभार मानले. हे प्रकल्प पुण्याच्या भविष्यातील विकासासाठी मैलाचा दगड ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना त्यांनी विविध मागण्या केल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्रलंबित असलेल्या ‘इनर रिंग’ रोडचे काम तातडीने युद्धपातळीवर सुरू करावे., खडकवासला ते लोणी काळभोर टनेल या २८ किमी लांबीच्या बोगद्यासाठी सरकारने २२०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या प्रकल्पामुळे शहरात शासनाच्या मालकीची ३४ किमीची मोकळी जागा मध्यभागात उपलब्ध होणार आहे. या जागेचा वापर भविष्यातील ट्रॅफिक नियोजनासाठी करावा, जेणेकरून पुणे ‘ट्रॅफिक मुक्त’ होईल, पुणे शहराला जोडणारे राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाया जात आहे. हायवे अथॉरिटी आणि पुणे महानगरपालिकेने एकत्रितपणे मोहीम राबवून ही अतिक्रमणे कालबद्ध पद्धतीने हटवावीत अशा मागण्या आमदार राहुल कुल यांनी केल्या आहेत
आमदार कुल यांच्या मागण्यांची दखल घेत राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी विधानसभेत माहिती दिली की, रिंग रोड प्रकल्पाच्या एकूण १२ पॅकेजेसपैकी ९ पॅकेजेसचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे. भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या १४.१ हेक्टर जागेसाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.महामार्ग आणि शहरातील अतिक्रमणे तातडीने हटवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात येतील व लवकरच रस्ते अतिक्रमण मुक्त केले जाईल.
पुणे आणि पर्यायाने दौंड मतदारसंघातील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटावा, यासाठी आमदार राहुल कुल सातत्याने पाठपुरावा करत असून, सरकारच्या या सकारात्मक भूमिकेमुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.






