शेतकऱ्यांनो पेरणीचा विचार करताय तर थोडं थांबा

पुणे : पावसाची हजेरी लागली की शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरु होते. मे महिन्यामध्ये तर इतका पाऊस बरसला की शेतकऱ्यांनी या पावसाच्या भरवश्यावर पुढील पेरणीचे नियोजन करून टाकले आहे. मात्र थोडं थांबा, कारण बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली असून आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. त्यामुळे किमान १० जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी व राज्यात काही भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

लांबलेल्या पावसामुळे राज्यातील काही भागामध्ये पुन्हा एकदा तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व परिस्थितीमुळे राज्यातील बहुतांश भागात कोरडे हवामान अपेक्षित आहे, ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल. विदर्भात ४० अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा व खानदेशात कमाल तापमान ३५ ते ४० अंशामध्ये राहील.

या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे.
कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.