‘या’ कारणामुळे राज्यातील ‘पालिका’ निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार, आता ‘या’ महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता

मुंबई : राज्यात पावसाळ्या अगोदर पालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता धूसर झाल्याचे दिसत असून आता या निवडणुका पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या निकालावरून या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडत असल्याचे दिसत आहे.

ओबीसी राजकीय आरक्षणाची सुनावणी 21 मार्चला होणार होती मात्र ही सुनावणी लांबणीवर गेल्याचे दिसत आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या सुनावणी समिती घटनापीठात सर न्यायाधीश हे असून त्याच दिवशी म्हणजे 21 मार्चला त्यांना दुसरी एक सुनावणी असल्याने ते या सुनावणीत उपस्थित राहू शकणार नाहीत त्यामुळे ही सुनावणी आता मे किंवा जून महिन्यात जाण्याची शक्यता आहे. सुनावणी नंतर निकाल दिला जाणार असल्याने महापालिका निवडणुका ह्या लांबणीवर पडणार असल्याचे दिसत आहे.

राज्यात सध्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते आपापल्या परीने मोर्चे बांधणी करताना दिसत असून केव्हाही निवडणुका जाहीर होतील असा त्यांचा समज आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता या निवडणुका लांबणीवर पडत असल्याने निवडणुकीस इच्छुक असणाऱ्यांमध्ये निराशा पसरल्याचे पहायला मिळत आहे.