Daund : दौंड मधील व्यापारी वर्गाचा लॉक डाऊन ला विरोध, मिनी लॉक डाऊनची मागणी



– सहकारनामा

दौंड : शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, हॉटेल, छोटे व्यावसायिक सरसकट 30 एप्रिल पर्यंत बंद राहतील असा आदेश राज्य सरकारने काढला आहे व त्याची बळजबरीने अंमलबजावणी केली जात आहे या शासनाच्या निर्णयाचा येथील व्यापाऱ्यांनी निषेध नोंदविला व संपूर्ण लॉक डाऊन ऐवजी मिनी लॉक डाऊन ची मागणी केली आहे. 

दौंड मर्चंट असो.चे अध्यक्ष राजेश पाटील व दौंड व्यापारी महा संघाचे अध्यक्ष राजेंद्र ओझा यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी आज तहसीलदारांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले आहे. निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की, प्रशासनाने पुणे शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी मिनी लॉक डाऊन जाहीर केला होता, त्यानुसार सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी होती, या  वेळेमध्ये सर्व दुकाने बंद केली होती. व इतर अटी, शर्ती लागू केलेल्या होत्या. या निर्णयाचे सर्वांनीच स्वागत करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. 

आणि त्याप्रमाणे सर्व व्यवहार चालू असताना दिनांक 6 एप्रिल पासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, हॉटेल, छोटे व्यावसायिक सरसकट दिनांक 30 एप्रिल पर्यंत बंद राहतील असा तुघलकी फतवा राज्य सरकारने अचानक पणे काढला व त्याची बळजबरीने अंमलबजावणी सुद्धा केली जात आहे. प्रशासनाचा पूर्वीचा मिनी लॉक डाऊन चा निर्णय योग्य होता त्याप्रमाणे बाजारपेठ चालू ठेवण्यास व्यापारी वर्गाला कोणतीही अडचण नाही. प्रशासनाने निर्बंध कडक करावेत परंतु संपूर्ण लॉकडाऊन केले तर व्यापाऱ्यांच्या कर्जाचे हफ्ते, लाईट बिल,कर्मचारी पगार,जागेचे भाडे त्यांनी भरायचे कसे,कारण व्यापारी वर्गाला यातून कोणतीही सूट मिळत नाही,मिळणार नाही.त्या मुळे प्रशासनाने  आपल्या निर्णयाचा फेरविचार करून संपूर्ण लॉक डाऊन मागे घ्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.