Daund – दौंडमधील रस्त्याचे काम वादाच्या भोवऱ्यात, अडथळे न काढताच केला जात आहे अरुंद रस्ता



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

दौंड शहरात सध्या अष्टविनायक मार्ग, रस्त्याचे काम सुरू आहे मात्र नगर पालिका प्रशासनाच्या काही चुकीच्या निर्णयामुळे या रस्त्याचे काम वादग्रस्त ठरताना दिसत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला सर्वपक्षीय विरोध सुरू झालेला आहे.

शहरातील नगर मोरी चौक ते शे.जो. विद्यालय परिसरापर्यंत प्रशासनाने जमतील तेवढे रस्त्यातील अडथळे काढत रस्त्याचे काम केले आहे. परंतु डॉ.आंबेडकर चौक परिसरातील रस्त्याचे काम सुरू करताना मात्र रस्त्या कामात येणारे कोणतेच अडथळे न काढता काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्वीसारखाच अरुंद राहणार आणि नेहमीच्याच समस्यांना दौंडकरांना पुन्हा तोंड द्यावे लागणार हे दिसू लागल्याने येथील सर्वच पक्ष, संघटनांनी, एवढेच काय नगरपालिकेतील दोन्ही गटातील नगरसेवकांनी सुद्धा या कामावर आक्षेप घेतलेला आहे. व या परिसरातील रस्त्यांना येणारे अडथळे काढूनच रस्ता करावा अशी भूमिका घेतलेली आहे.

रस्त्यातील अडथळे काढण्यासाठी कोणाचाच विरोध नसताना अडथळे का काढले जात नाहीत याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. हा रस्ता 17,11 की 7 मीटरचा करावयाचा याचाही कोणाला थांगपत्ता नाही हे दुर्दैव. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका समोरील काम सुरू झाल्या नंतर, या ठिकाणच्या रस्त्याचा आराखडाच बदलला आहे. सदरचा रस्ता स्मारकाला लागून येत नसून तो स्मारकाच्या बाजूला मुद्दाम सरकवला असल्याचा आक्षेप घेत येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ ऑफ इंडिया( आठवले गट) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती यांनी रस्त्याचे काम थांबविले आहे.आणि येथील सर्वच पक्षाने त्यांना पाठिंबाही दिला आहे.

स्मारकाच्या समोरील बाजूला असणाऱ्या धनाढ्य लोकांच्या दुकानांचे नुकसान होऊ नये म्हणून हा रस्ता स्मारकाच्या बाजूला सरकवीला गेला आहे असा आरोप आर. पी. आय.च्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यावेळी विकास कदम, प्रकाश भालेराव, सतीश थोरात, बादशहा शेख, राजेश गायकवाड, नरेश डाळिंबे, विनायक माने, समीर शेख, विवेक गटणे, नागेश साळवे, तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अमित सोनवणे उपस्थित होते.

प्रशासनाच्या वादग्रस्त भूमिकेमुळे या रस्त्याचे कामही चांगलेच वादग्रस्त ठरत आहे. डॉ. आंबेडकर चौक ते भिमनगर या मार्गावरील 40 ते 50 खाजगी मालमत्ता धारकांच्या काही जागा या रस्त्या कामाला अडथळा ठरत आहेत. या लोकांची यादी सुद्धा नगरपालिकेकडे तयार आहे,मात्र मागील 15 महिन्यामध्ये नगरपालिकेने एक साधी नोटीसही या मालकांना दिलेली नाही. त्यामुळे या  ठिकाणचा रस्ता अडथळे न काढताच करावयाचा हे प्रशासनानेच मनाने ठरविले आहे की काय असा प्रश्न दौंडकर विचारीत आहेत.

नगर पालिकेतील जेष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया व बादशाह शेख सह दोन्ही गटाच्या नगरसेवकांनी रस्त्यातील अडथळे काढूनच रस्ता करावा अशी भूमिका स्पष्ट घेतली असताना ही नगर पालिका प्रशासन सदरचे अडथळे काढत नाही याचा  अर्थ न.पा. या नगरसेवकांचे ही ऐकत नाही असे दिसते आहे. एखाद्या रस्त्याचे काम जर नगर पालिका हद्दीतून होत असेल तर या रस्त्या कामाला येणारे अडथळे काढण्याचे काम नगरपालिका प्रशासनाचेच आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन हे अडथळे का काढत नाही हे तरी नगरपालिकेने स्पष्ट करावे अशी दौंडकरांची अपेक्षा आहे.