Daund – दौंड नगरपालिकेकडून मध्यरात्री नंतर पिण्याचे पाणी सोडले जात असल्याने हंडा मोर्चा आंदोलनाचा इशारा



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

दौंड शहरातील कुंभार गल्ली, अण्णाभाऊ साठे नगर परिसरात दौंड नगरपालिका गेल्या अनेक वर्षापासून मध्यरात्रीनंतर(रात्री 12 ते 2 दरम्यान) पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत असल्याने या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

येत्या सात दिवसांमध्ये नगरपालिकेने या परिसरातील पाण्याची ची वेळ बदलली नाही तर नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा या परिसरातील त्रस्त नागरिकांनी नगरपालिकेला निवेदनाद्वारे दिलेला आहे. या  दोन्ही परिसरात कष्टकरी,वीट भट्टी कामगार,कुंभार व्यवसायिक, नगरपालिका कर्मचारी तसेच हातावर पोट भरणारे असंख्य नागरिक राहत आहेत. गेल्या अनेक एक वर्षापासून या परिसरात नगरपालिकेकडून रात्री 12 ते 2 वा. दरम्यान केव्हाही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे,.

नागरिकांच्या झोपेच्या वेळेस पाणी  पुरवठा होत असल्याने नागरिकांना रात्र रात्र जागरण करावे  लागत आहे यामुळे त्यांच्या  दैनंदिन कामावर त्याचा मोठा परिणाम होत असून या सततच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या  परिसरातील पाणी  पुरवठा सकाळी 6 ते 8 वा. दरम्यान अथवा सायंकाळी 7 ते 9 वा. दरम्यान करावा अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास सात दिवसा नंतर केव्हाही  कुंभार गल्ली व अण्णाभाऊ साठे परिसरातील त्रस्त नागरिकांच्या वतीने दौंड नगरपालिकेवर हंडा मोर्चा आंदोलन केले जाईल असा इशाराही  निवेदनातून देण्यात आला आहे. 

निलेश सावंत, गजानन निंबाळकर, उद्धव घोडके, मारुती औरंगे, उपेश तुपसौंदर्य, शिरीष झोजे, माऊली झोजे, गणेश अल्हाट, अमित मोरे, अक्षय पवार, गणेश कुंभार, शिरीष कुंभार, हिरण खुडे, संदीप सावंत, अनुप आगलावे आदी उपस्थित होते.