Breaking News : अखेर राज्याच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा!



– सहकारनामा

मुंबई : राज्यात एका मागोमाग एक घडलेल्या घटनांमुळे अगोदरच महाविकास आघाडीच्या अडचणी वाढत असताना आज मुंबई हायकोर्टाने गृहमंत्र्यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याने   राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. 



मुंबई हायकोर्टाच्या आदेशामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये नाट्यमय घडामोडी होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असल्याची घोषणा केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी स्वत:  राजीनामा दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच गृहमंत्री आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लवकरच सोपवणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खा. शरद पवार खा. सुप्रिया सुळे यांची बैठक झाली होती.

काय आहे प्रकरण…

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये पोलिसांमार्फत वसुली करण्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी परबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

या खटल्याची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख हे गृहमंत्री असल्याने पोलिस या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकणार नाहीत. अशा वेळी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात येते असल्याचे आपल्या आदेशात म्हटले आहे.