Breaking News – ‘महाराष्ट्रभूषण’ कार्यक्रमाला उपस्थित 11 जणांचा ‘उष्माघाताने’ मृत्यू

मुंबई : मुंबई येथे आयोजित महाराष्ट्रभूषण पुरस्कार कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या 11 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

आज मुंबई येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यासाठी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी हजारो लोक आले होते. मात्र कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. यातील अनेकांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र यामध्ये 11 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना, ही वेदनादायी घटना आहे. मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये देणार असून उपचारार्थ दाखल सर्व रुग्णांचा खर्च करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रात्री रुग्णालयाला भेट देत उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला आणि डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली आहे.