बारामती : सहकारनामा ऑनलाईन
– महाराष्ट्रामध्ये कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. याचा गैरफायदा काही किराणा मालाचे व्यापारी घेत असून त्यांच्याकडून जास्तीच्या दराने लोकांना जीवनावश्यक वस्तूंची विक्री केली जात आहे अशा किराणा दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका पक्षनिरीक्षक बापूराव सोलणकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे. या मागणीमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे परंतु जिल्ह्यातील अनेक किराणा मालाचे व्यापारी, दुकानदार जादा दराने विक्री करीत असल्याचे दिसून आले आहे. किराणा मालाच्या अनेक वस्तूंचे दर १० ते २० टक्क्यांनी वाढवले आहेत शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे विक्री न करता वाढवून पैसे घेतले जातात त्यामुळे लोकांना जास्तीच्या दराने किराणा माल खरेदी करावा लागत आहे, खरे तर संपूर्ण जगामध्ये कोरोणाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे, अशातच संकट काळी व्यापाऱ्यांनी माणुसकी दाखवणे गरजेचे आहे मात्र परिस्थिती बिकट असताना काही व्यापारी मात्र आपले खिसे भरण्यात व्यस्त आहेत. पण ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर आपण पैसे कमावतो आज तो बळीराजा अडचणीत आहे अशा काळात मदत करण्या ऐवजी जादा दराने किराणा मालाची विक्री केली जाते हे दुर्दैवी असून अशा दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका निरीक्षक बापूराव सोलनकर यांनी केली आहे.