दौंडमध्ये विज ग्राहकांसाठी तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन
दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ ऑफ इंडिया(आठवले गट), राष्ट्रीय समाज पार्टी तसेच नागरिक हित संरक्षण मंडळाच्यावतीने येथील विज ग्राहकांसाठी तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मार्च महिन्यात सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आल्याने महावितरण कंपनीनेसुद्धा त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने मिटर रीडिंग घेऊन विज बिल देणे बंद ठेवले होते. या काळात कंपनीतर्फे अंदाजे बिल आकारणी करण्यात आली होती.
या लॉकडाऊनमध्ये बिल भरण्यासाठी महावितरण तर्फे तगादा नसल्याने बहुतांशी ग्राहकांनी विज बिल थकित ठेवले. परंतु आता एकदम सहा महिन्याचे विज बिल द्यावे लागणार असल्याने सामान्य ग्राहकांची मोठी आर्थिक अडचण होत आहे. त्यातच नेहमी येणाऱ्या विज बिला पेक्षा कितीतरी पटीने अनेकांना जास्तीचे बिल आले आहे. अशा वीज बिला बाबत सर्वांच्याच तक्रारी येत आहेत. लॉक डाऊन काळातील एप्रिल, मे,जून या महिन्याची वीज बिले सरकार माप करणार आहे.
तसेच विज बिल भरण्यासाठी हप्ते सुद्धा बांधून देण्यात येणार आहे असा सर्वच विज ग्राहकांचा समज आहे त्यामुळे अनेकांनी सप्टेंबर महिन्या अखेरपर्यंत विज बिल भरलेले नाही. त्यामुळे वीज बिलाचा आकडा आणखीनच वाढलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये विज ग्राहकांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी व आलेल्या जास्तीच्या बिलांच्या दुरुस्तीसाठी विज ग्राहकांचा थेट महावितरण च्या अधिकाऱ्यांशी संवाद व्हावा या उद्देशाने भाजपा शहराध्यक्ष फिरोज खान व ना.हि.सं. मंडळाचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष योगेश कटारिया यांच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास 400 विज ग्राहकांनी मेळाव्यामध्ये उपस्थिती दर्शवून आपल्या शंकेचे निरसन करून घेतले. काही ग्राहकांना आलेली जास्तीची बिले जागेवरच दुरुस्त करून देण्यात आली तसेच सर्वांनाच विज बिल भरणे सोपे जावे म्हणून वीज बिलाचे पैसे हप्त्याने भरण्याची सवलत देण्यात आली. यावेळी महावितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता वैभव पाटील व सहा. अभियंता संदीप रणदिवे यांनी उपस्थित विज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करीत मार्गदर्शन केले. नगराध्यक्षा शितल कटारिया, नगरसेवक तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.