शाळा लवकर सुरू करण्याची रिस्क घेण्यापेक्षा ‛हा’ उपाय केल्यास विद्यार्थ्यांची हजेरी पूर्ण करता येईल आणि शाळाही उशिरा सुरू होईल : आ.कुल यांची मुख्यमंत्रांकडे विशेष मागणी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. असे असतानाही राज्यातील शाळा चालू करण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. या निर्णयाने पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे शाळा उशिरा सुरू करूनही जर वार्षिक असणाऱ्या सुट्ट्या कमी केल्या तर विद्यार्थ्यांची हजेरी पूर्ण करता येईल आणि शाळाही उशिरा सुरू करून कोरोनापासून विद्यार्थ्यांचा बचाव होईल अशा आशयाची मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी राज्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांकडे पत्राद्वारे केली आहे.

याबाबत आमदार राहुल कुल यांनी आपले मत मांडताना महाराष्ट्रातील शाळांना एप्रिल मे व जून महिन्यात उन्हाळ्याची सुट्टी व ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान दिवाळीच्या सुट्टीचा कालावधी मिळतो, सध्याच्या काळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुढील शैक्षणिक वर्षात सुट्ट्या रद्द करून शाळा उशिरा चालू करण्याचा निर्णय घेतला तर शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी वेळ मिळेल, अभ्यासक्रम कमी न करता फक्त सुट्टीचा कालावधी कमी करून अभ्यासक्रम देखील पूर्ण करता येऊ शकतो व  त्याद्वारे विद्यार्थ्यांचा कोरोनापासून बचाव देखील करता येवू शकतो असे सांगत शासनाने सध्याचा परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शाळा सुरु करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व शालेय शिक्षण मंत्री मा. वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे  याबाबत आता शासन काय निर्णय घेते याकडे पालक वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.