दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
फुले, शाहू,आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात दलित व बौद्ध समाजावरील अत्याचारात वाढ झाली असताना राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाचे सरकार याबाबत अकार्यक्षम ठरलेले आहे असा आरोप करत मुख्यमंत्री व महाविकास आघाडी सरकार विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशाने आज (दि.११) दौंड येथे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी दौंड पोलिसांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.
राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकार च्या काळात संपूर्ण राज्यात दलित व बौद्ध समाजावरील अन्याय, अत्याचाराचा आलेख सतत वाढत असून दिवसा ढवळ्या दलित तरुणांचे खून होत आहेत. या राज्यात कायदा अस्तित्वात राहिला आहे काय? असा संभ्रम दलित समाजामध्ये आहे. दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या वाढत्या अत्याचारांबाबत विद्यमान मुख्यमंत्री चकार शब्द बोलायला तयार नाहीत. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राजगृहाची तोडफोड झाली, तसेच काही शहरी भागांमध्ये दलित युवकांवर खोट्या केसेस करून त्यांचा आवाज दाबला जात आहे, या सर्व घटनांचा निषेध निवेदनाद्वारे नोंदविण्यात आला व राजगृह तोडफोड प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट) चे पदाधिकारी रवी कांबळे, प्रकाश भालेराव, विकास कदम,सतीश थोरात, तेजस कांबळे, रोहित कांबळे, बबलू कांबळे,राजू जोगदंड, आरिफ शेख,भारत सरोदे तसेच महिला पदाधिकारी आशा मोहिते, इंदुमती जगदाळे,सुनीता वंटे आदी उपस्थित होते.