कोरोना’शी लढण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी)

कोरोना संसर्गाचा शिरकाव हवेलीतील बहुतेक गावात झाला असून रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे यावर प्रतिबंध घालण्यासाठी शासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागल्या आहेत परंतु सर्वसामान्य नागरिकांचे सहकार्य मिळाल्या शिवाय यावर नियंत्रण मिळविता येणार नाही. 

सध्या लोणी काळभोर, कदमवाकस्ती, शेवाळेवाडी, कुंजीरवाडी, थेऊर, उरुळी कांचन यासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. दररोज त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांची चाचणी घेतली जात आहे. आरोग्य विभाग रात्रंदिवस याकामी नेटाने कामाला लागला आहे. परंतु या गावातील नागरिकामध्ये याबद्दल अपेक्षित असे सहकार्य मिळत नाही. शासन वेगवेगळ्या माध्यमातून सोशल डिस्टंशिंग पाळण्याची विनंती केली जात आहे परंतु अनेकजण याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. 

लोणी काळभोर, थेऊर या गावामध्ये तीन दिवसाचा पूर्ण लाॅकडाऊन केला आहे. खरेतर आरोग्य विभागाने याबद्दल रुग्ण सापडल्यावर लगेच निर्णय घेतला जावा असे सुचवले होते परंतु साधारणपणे चार दिवस नंतर हा निर्णय घेण्यात आला. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हा लाॅकडाऊन महत्वाचा असतो.

थेऊरमध्ये रुग्ण सापडल्यावर एक आठवडा लोटला तरीही गावात घरोघरी सर्वेक्षण होऊ शकले नाही यासाठी काही अडचणी असल्याचे कळले तर कुंजीरवाडी ग्रामपंचायतीने ताबडतोब सर्व आरोग्य विषयक साधने उपलब्ध करुन दिल्याने तेथे दररोज सर्वेक्षण चालू झाले आहे. कुंजीरवाडीच्या सरपंच सुनिता संदीप धुमाळ यांनी सांगितले की, नागरिकांच्या आरोग्य विषयक प्रश्न महत्वाचा आहे यासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी तयार आहे ग्रामस्थांनी केवळ सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. हवेली तालुका आरोग्य अधिकारी डाॅ सचिन खरात यांनी नागरिकांनी कोरोना संदर्भात कोणतीही माहिती लपवू नये, त्वरित आरोग्य खात्याशी संपर्क करावा यामुळे याचा फैलाव रोखण्यासाठी मदत होणार आहे या आजाराला घाबरण्याचे कारण नाही. प्रत्येकाने आपली, आपल्या कुटूंबाची, समाजाची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.