Big News … तर लवकरच राज्यात पुन्हा लॉकडाउन! : मुख्यमंत्री



मुंबई : सहकारनामा

राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे रुग्णांना बेड्स आणि इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे पाहायला मिळत असून याबाबत  आज आयोजित करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना आल्या आहेत. 

आज कोविड संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉक्टर तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सामील होते. या बैठकीत झालेल्या चर्चेत राज्यात निर्बंध आणि नियमांचे कठोरपणे पालन होणार नसेल तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर मोठी चर्चा झाली. 

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना 50% कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना या बैठकीत दिल्या.

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना हे स्पष्ट निर्देश दिले की एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत, मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट हवी तशी गांभीर्याने घेत नाहीत. आणि अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही. विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्कचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला आमचे प्राधान्य राहणार असून त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन केले गेले नाही तर मात्र लॉकडाऊन करावं लागेल. आणि यासाठी धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

या बैठकीत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ग्रामीण भागात रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्काचा शोध अधिक गतिमान करण्याची गरज व्यक्त केली. आणि खास करून छोट्या शहरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आव्हान असून ई आयसीयू वर भर देण्यासाठी पाउले उचलण्यात येतील असे सांगितले. महाराष्ट्रातील लसीकरण देशात चांगले असून ग्रामीण भागात उपकेंद्रांवर लसीकरण वाढवले तर अधिक वेग मिळेल असे सांगितले.

कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिरा रुग्णालयांत पोहचत आहेत ही चिंतेची बाब असून त्यामुळे अगदी १० ते १८ वयोगटात देखील मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसत आहे त्यामुळे पुढील काळात तरुणांमध्ये देखील मृत्यूचे प्रमाण वाढू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.