बेबी कॅनॉलमुळे उन्हाळ्यातही पिके हिरवीगार, 5 टीएमसी अतिरिक्त पाण्यामुळे दौंडची शेती बहरली

अब्बास शेख

दौंड : बेबी कॅनॉल सुरु झाल्यानंतर या पाण्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीला कमालीचा बहर आला आहे. उन्हाळ्यात पिकाचे काय होईल अशी भीती बाळगून पिके न घेणारे शेतकरी आता बेबी कॅनॉलच्या माध्यमातून मिळणाऱ्या पाण्याच्या जोरावर बिनधास्तपणे ती पिके घेताना दिसत आहेत. दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊस पिकवला जातो आणि उसाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते मात्र बेबी कॅनॉल च्या माध्यमातून सुमारे 5 टीएमसी इतके मुबलक पाणी शेतीसाठी उपलब्ध झाल्याने आता दौंड तालुक्यात उसपीक पुन्हा बहरू लागले आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड आणि हवेली तालुक्यात खडकवासला जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल) दुरुस्ती व अस्तरीकरणामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात मुबलक व सुरळीत पाणी मिळत आहे. लोणीकाळभोर ते पाटसपर्यंतच्या ६७ किमी कालव्याच्या मजबूतीकरणामुळे पाण्याची गळती थांबली असून, पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत आहे, ज्यामुळे ऊस व इतर पिकांसाठी मोठा आधार मिळाला आहे. बेबी कॅनॉलच्या अस्तरीकरणामुळे पाण्याची वहनक्षमता वाढली आहे, परिणामी शेतकऱ्यांना अतिरिक्त पाणी मिळत आहे.

याचा सर्वात मोठा फायदा दौंड, हवेली, बोरीऐंदी, सहजपूर, खामगाव, कासुर्डी, यवत, खुटबाव, केडगाव, लोणी काळभोर, कुंजीरवाडी आणि सोरतापवाडी या भागातील शेतीला मोठा होत आहे. या पाण्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी आणि ऊस पिकांना मोठा दिलासा मिळत असल्याबे बेबी कॅनॉलमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास हातभार लागत आहे.