दौंड नगरपरिषदेची निवडणूक लढविलेल्या उमेदवाराचा अपघाती मृत्यू, उस वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाच्या चुकीमुळे शेख कुटुंबावर मोठं संकट

दौंड : उस वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाच्या घोडचुकीमुळे दौंड नगरपरिषदेची निवडणूक लढविलेले उमेदवार अकबर करीम शेख यांचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांची पत्नी नसरीन अकबर शेख या गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत शाहिद करीम शेख, (वय 32 वर्षे, रा. ओम शांतीनगर गजानन सोसायटी दौंड ता. दौंड जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकबर शेख हे दिनांक 05/01/2026 रोजी सकाळी 09.00 च्या सुमारास त्यांच्याकडील होन्डा ॲक्टिवा स्कुटी मोटार सायकल नं. MH 42 BQ 4965 यावरून पत्नीसह शालीमार चौकातून घरी जात होते. यावेळी दौंड शहरात योगराज हॉटेल समोर दौंड – नगर रोडवर टाटा कंपनीचा उसाने भरलेला ट्रक नं MH 12 FZ 7493 हा भरधाव जात असताना त्या ट्रकवरील चालकाने त्या ट्रक ची रस्सी योग्य ती खबरदारी न घेता धोकादायकरीत्या मोकळी सोडली होती.

त्या रस्सी ने रस्त्यावरून जाणाऱ्या एखाच्या वाहन चालकाच्या जिवीतास धोका उत्पन्न होवुन त्याचा जिव जावु शकतो याची जाणिव, ज्ञान त्या ट्रॅक चालकाला असतानादेखील सदर चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक हा वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात निष्काळजीपणे व बेदरकारपणे रस्त्याचे व रहदारीचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालविल्याने त्याच्या ताब्यात असलेल्या ट्रक ची रस्सी उडुन फिर्यादी यांचा भाऊ अकबर करीम शेख व वहीणी नसरीन अकबर शेख यांच्या अंगावर पडली.

यावेळी या रस्सी चा अकबर शेख यांच्या गळयाला फास बसून या दांपत्यासोबत भिषण अपघात घडला. या अपघातामध्ये अकबर करीम शेख (वय 38 वर्षे) यांना गंभीर दुखापत होवुन त्यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला तर त्यांची पत्नी नसरीन अकबर शेख या गंभीर जखमी झाल्या. मात्र तरीही सदर ट्रक चालक हा अपघाताची खबर न देता तसाच निघुन गेला. दौंड पोलिसांनी शाहिद शेख यांच्या फिर्यादीवरून टाटा कंपनीचा उसाने भरलेला ट्रक नं MH 12 FZ 7493 यावरील अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिद्री हे करीत आहेत.

उपचार करणाऱ्या दवाखान्यावर ही नातेवाईकांचे गंभीर आरोप – या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अकबर शेख यांना दौंड शहरातील खाजगी दवाखान्यात तातडीने भरती कारण्यात आले. अगोदर त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले मात्र नंतर त्यांची प्रकृती बिकट बनली असून त्यांना त्वरित उपचारासाठी पुण्याला घेऊन जावे असे सांगण्यात आले. रुग्णाला पुढील उपचारसाठी घेऊन जात असताना रुग्णाचा वाटेतच मृत्यू झाला अशी माहिती नातेवाईकांनी दिली. या सर्व प्रकारामुळे रुग्णांचे नातेवाईक कमालीचे संतप्त झाले. रुग्णाची प्रकृती जर गंभीर होती तर अनेक तास त्याला त्या रुग्णालयाने का थांबवून ठेवले, त्वरित पुण्यातील मोठ्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला का दिला नाही. ज्यावेळी रुग्ण उपचाराला दाद देत नाही हे पाहिल्यानंतर त्याला पुण्याला घेऊन जाण्यासाठी सांगण्यात आले त्यामुळे रुग्णाचा वाटेत मृत्यू झाला. या सर्व प्रकाराला ते रुग्णालय सुद्धा तितकेच जबाबदार आहे असा आरोप नातेवाईकांनी करत दौंड शहरातील त्या रुग्णालयावर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी त्यांनी दौंड पोलीसांना करत पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती.