निसर्ग’ वादळाच्या प्रकोपानंतरही विज मंडळाच्या प्रयत्नाने विज पुरवठा पूर्ववत करण्यात यश



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी)


निसर्ग चक्री वादळाने कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मोठे नुकसान केले असून यामध्ये  नैसर्गिक साधन सामग्रीचे अतोनात नुकसान झाले असून महावितरण कंपनीला या वादळाचा मोठा फटका बसला आहे.

पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन उपविभागातील सर्वच विज वाहिन्या सकाळी अकरा वाजेपर्यंत नादुरुस्त झाल्या होत्या परंतु सायंकाळी सहा नंतर विज मंडळाच्या अथक प्रयत्नानंतर रात्री एक वाजता बहुतेक सर्व विज पुरवठा पूर्ववत झाला. उरुळी कांचन विज मंडळाचे उपविभागीय अधिकारी उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन उपविभागातील थेऊर लोणी काळभोर उरुळी कांचन शहर ग्रामीण उपकेंद्रातील सर्व वाहिन्या सकाळी निसर्ग वादळाची तिवृता वाढत गेली तशा नादुरुस्त होत गेल्या आमचे सर्व अधिकारी व कर्मचारी या परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते प्रत्येक दोन तासाला वरिष्ठांना अहवाल दिला जात होता.दुपारी वार्याचा वेग जास्त होता यावेळी अनेक झाडे उन्मळून पडली तर उच्च वाहिन्यावरील साधारणपणे पाच खांब तर लघू वाहिन्यावरील पंधरा खांब पडल्याची माहिती मिळाली आहे. सायंकाळी सहा नंतर उपकेंद्राचे अधिकारी संजय पोफळे, नईम सुतार, हाजिमल बागवान, गजानन मोरे,निखिल कोंडिलवार यांनी आपापल्या क्षेत्रात मंडळाचे कर्मचारी, विज जनमित्र, बाह्यश्रोत यांची मदत घेऊन भर पावसात कामाला सुरुवात केली सायंकाळी सात वाजल्यापासून एक एक वाहिनी चालू केली.या उपविभागातील सर्व विज पुरवठा रात्री अकरा वाजता पूर्ववत झाला.दरम्यान यवतहून येणारी 33 केव्ही उच्च वाहिनी नादुरुस्त झाली ती दुरुस्ती करण्यासाठी हा सर्व कर्मचारी वर्ग कामाला लागला आणि रात्री एक वाजता विज पुरवठा पूर्ववत केला. काही ठिकाणी खांब कोसळल्याने तेथील पुरवठा येत्या दोन तीन दिवसात चालू होईल असे सुरवसे यांनी सांगितले.