महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पाठपुराव्याला यश, पत्रकारांना 50 लाखाचे विमा कवच



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही असलेल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या विषाणूचा धोका पत्करुन पत्रकार, वार्ताहर, रिपोर्टर यांनी अचूक वार्तांकन करत आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले आहेत. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेत लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान राज्य संघटक संजय भोकरे यांनी पत्रकारांना एक कोटी विमा कवच जाहीर करण्याची मागणी सरकार कडे केली होती. तसेच पोलीस , डॉक्टर , आरोग्य सेवक हे कोरोनायोध्दा आहेत तसेच पत्रकार हा सुध्दा कोरोना योध्दा असून शासनाने दुर्लक्ष करु नये असे वारंवार म्हटले होते.

महाराष्ट्रातील सर्वच विभागातील पञकार बांधवांकडून तसेच पत्रकार संघाकडून विमा संरक्षण तसेच पॅकेजची मागणी करण्यात आली होती. अशातच आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना काळात कर्तव्यावर असणारा पत्रकार मृत्यूमुखी पडला तर त्यास पन्नास लाखाचे विमा कवच मिळणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र त्या पत्रकारास संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकार्याने पत्रकार असल्याचे पत्र द्यावे लागणार आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने शासनाकडे पॅकेजसह अनेक योजना, सवलती, विमा कवच याची मागणी लावून धरली होती. त्यातील पत्रकारांना पन्नास लाखाचे विमा कवच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पाठपुराव्याला यश मिळाल्यामुळे पत्रकार वर्गातून समाधान व्यक्त होत आहे . पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे , कार्यध्यक्ष राकेश टेळ्ये ,किरण जोशी, प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ देशकर, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, संघाचे मंत्रालय संपर्क प्रमुख नितीन जाधव यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहे.