पालखी मार्गांची कामे 31 मार्च पर्यंत पूर्ण होणार! उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश



पुणे : सहकारनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे ३१ मार्च अखेर पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

 उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव तसेच पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही मार्गांची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण होतील, असे नियोजन करावे. एखादा प्रकल्प काही कारणांमुळे लांबला तर खर्चात वाढ होते. या दोन्ही मार्गांचे भूसंपादन आणि मावेजा वाटप करण्यात यावे. 

आवश्यकता भासल्यास विभागीय आयुक्त राव यांनी वेगळी बैठक घेऊन विषय मार्गी लावावा, असे आदेशही उप मुख्यमंत्री श्री पवार यांनी दिले. या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.