दौंड : सहकारनामा ऑनलाइन
दौंड तालुक्यातील पूर्व भागात काल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी झाली. काल केवळ दोन तासांमध्ये खडकी भागामध्ये 165 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसे पाहिले तर हा भाग पर्जन्यछायेचा असल्यामुळे कधीच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत नाही. म्हणून या भागात कधीही पूर परिस्थिती आली नव्हती. मात्र काल ल रात्री पावसाने आपले रौद्ररूप धारण केले आणि सर्वत्र हाहा कार माजला.
याबाबत दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी आपली आपबिती सांगितली…
पुणे सोलापूर हायवेवर काही अघटीत घडत असल्याची माहिती मिळाली आणि अपुरे साधन सामग्री असताना सुद्धा दौंड पोलीस ठाण्यातर्फे आम्ही तात्काळ प्रतिसाद देऊन स्वामी चिंचोली, दत्त कॉलेजच्या समोर पोहोचलो. तेथे पुणे-सोलापूर हायवेवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्या लोंढ्यात एसटी व एक बीएमडब्ल्यू कार अडकली होती. त्यातील प्रवाशांना बाहेर काढले. तसेच इतर पाच कार सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्यात आल्या.
सदर त्याठिकाणी तात्काळ बेरी कटिंग करून होमगार्ड, महामार्ग सुरक्षा पथक व पोलीस कर्मचारी लावून वाहतूक एकेरी मार्गावर वळवण्यात आली आणि होणारा संभाव्य अपघात टळला. त्यानंतर मळद गावच्या शिवारातील छोटा तलाव फुटल्याने पाण्याचा प्रचंड प्रवाह गावात आला व घरात पाणी शिरू लागले त्यावेळेस ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत कॉल देऊन लोकांना सुरक्षित स्थळी हलवविण्यात आले.
त्यानंतर रावणगाव नंदादेवी खडकी या गावात लोकांना ग्राम सुरक्षा यंत्रणेचा कॉल देऊन सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले. त्यानंतर कुरकुंभ उड्डाणपुलाच्या खाली पाणी तुडुंब भरल्याने त्यात एक पिकअप अडकली त्यात एक माणूस वाहून जात होता. एक तासापासून तो पुरामध्ये होता त्याला फायर ब्रिगेड व जेसीबीच्या मदतीने सुखरूप सोडवले.
स्वामी चिंचोली या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्या निवासस्थानी एक महिला डॉक्टर व त्यांची दोन नातेवाईक अडकले त्यांना सोडवण्यासाठी फायर ब्रिगेड व आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटी सहित जाऊन बोटीतून उतरून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु बोट पुराच्या झालेला लागल्याने किरकोळ अपघात झाला मात्र बाका प्रसंग टळला व त्या लोकांशी फोनवर बोलून ते सुरक्षित असल्याची खात्री करून त्यांना धीर दिला व सकाळी त्यांना सोडण्यात आले.
खानोटा फारसा वर्दळीच्या नसलेल्या रस्त्यावर पाणी आल्याने पुरामध्ये एकूण चार लोक वाहून गेले पोलिसांच्या मदतीने व गावकर्यांच्या मदतीने त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने ते वाचू शकले नाही. सकाळी गावकऱ्यांच्या मदतीने तीन शव बाहेर काढण्यात आले चौथ्याचा शोध सुरू आहे.
अशा रीतीने दौंड पोलिसांनी ग्राम सुरक्षा यंत्रणाचा प्रभावी वापर केला व ग्रामस्थांची मदत घेतली व इतर सर्व खात्यांशी समन्वय ठेवून अनेक लोकांचे प्राण वाचवले. सदर भागात फारशी पूरपरिस्थिती नसल्याने पूर्वतयारी नसताना सुद्धा पूर परिस्थिती व्यवस्थित हाताळल्याने दौंड पोलिसांचे नागरिक कौतुक करत आहेत.