प्राप्तीकर विभागाने महाराष्ट्रात टाकलेल्या छाप्यांमध्ये 184 कोटी रुपयांचे बेहिशेबी व्यवहार उघडकीस

नवी दिल्ली :
प्राप्तीकर विभागाने मुंबईतील दोन बांधकाम व्यवसायातील समूह आणि त्यांच्याशीसंबंधित काही व्यक्ती व संस्थांच्या कार्यालयांवर छापे टाकून जप्तीची कारवाई केली आहे.
आयकर विभागाने 7 ऑक्टोबर रोजी शोध मोहीमेला सुरुवात केली होती आणि मुंबई, पुणे, बारामती, गोवा, जयपूरमधील सुमारे 70 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.
या कारवाईत मिळालेल्या पुराव्यांमधून प्रथमदर्शनी अनेक बेहिशेबी आणि बेनामी व्यवहार उघड झाले आहेत. आक्षेपार्ह कागदपत्रे, दोन समूहांचे सुमारे 184 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्नाचे पुरावे सापडले आहेत.
या कारवाईमध्ये या व्यावसायिक गटांनी विविध कंपन्यांचे जाळे निर्माण करूनव्यवहार केल्याचे  आढळून आले आहे जे प्रथमदर्शनी संशयास्पद आहेत.  या निधीच्या प्रवाहाचे प्राथमिक विश्लेषण असे सूचित करत आहे की बोगस शेअर प्रीमियम, संशयास्पद असुरक्षित कर्ज, विशिष्ट सेवांसाठी आगाऊ रक्कम, अस्तित्वात नसलेले सौदे, यासारख्या विविध संशयास्पद मार्गाने बेहिशेबी निधी जमवण्यात आला आहे.  महाराष्ट्रातील एका प्रभावशाली कुटुंबाच्या सहभागातून या निधीचा ओघ आल्याचे आढळून आले आहे.
संशयास्पद पद्धतीने जमवण्यात आलेल्या या निधीचा उपयोग विविध मालमत्तांच्याअधिग्रहणासाठी केला गेला आहे. यात मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी कार्यालय इमारत, दिल्लीतील आलिशान परिसरातील फ्लॅट, गोव्यातील रिसॉर्ट, महाराष्ट्रातील शेतजमिनी आणि साखर कारखान्यांमध्ये गुंतवणूक यांचा समावेश आहे. या मालमत्तांचे मूल्य सुमारे 170 कोटी रुपये आहे.
2.13 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आणि 4.32 कोटी रुपयांचे दागिने जप्तकरण्यात आले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.